परीक्षण क्रमांक : २६
दिनांक: ११ एप्रिल २०२३
पुस्तकाचे नाव: चांगुणा
लेखक: आचार्य अत्रे
ग्रंथपेटी क्रमांक: १८
पुस्तक क्रमांक: ४२७
परीचयकर्ती आणि समन्वयिका: गौरी देवधर
आचार्य अत्रे यांची ‘चांगुणा’ ही कादंबरी प्रत्यक्षात एका स्त्रीच्या जीवनात घडलेल्या घटनांवर आधारलेली आहे. अत्र्यांना आयुष्यात भेटलेली ही यशोदा इतकी भावून गेली की जेव्हा यशोदा त्यांना भेटली तेव्हा त्यांना तिच्या आयुष्यावर वास्तववादी कादंबरी लिहावीशी वाटली. ह्यात त्यांनी तिची तीव्रपणे जगण्याची धडपड मांडली आहे. अर्थात यशोदा व चांगुणा यांच्या आयुष्याचा शेवट वेगळा आहे.
अल्लड वयात एका मुलीला दुसऱ्या व्यक्तीविषयी वाटणारे तरल भाव. जेव्हा ती व्यक्ती तिच्या आयुष्यातून काही सामाजिक विरोधामुळे निघून जाते आणि मग आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वळणावर अगदी जन्मदात्यांपासून ते आयुष्यात आलेल्या प्रत्येकाने चांगुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण ती त्या सर्वांना पुरून उरली. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिने केवळ संघर्षच केला. ह्या प्रत्येक वळणावर तिला जशी वाईट माणसे भेटली तेवढीच चांगलीही भेटली आणि कदाचित त्यातूनच तिला जगण्याची नवीन आशा निर्माण होत गेली. आणि म्हणूनच कदाचित ती शेवटपर्यंत जगली. आयुष्यात अनुभवलेल्या अनेक चढउतारांमुळे निदान पोटच्या मुलांना तरी नीट जगता यावे यासाठी चांगुणा स्वत:ला संपवते आणि मग तिची मुले अनाथाश्रमात प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात.
“चांगुणा‘ कादंबरीतील स्त्रीमध्ये दिसणारी हिंमत आणि मानसिक शक्ती आज मला सर्वच महिलांत आढळते. कुटुंबप्रमुख गेल्यावर संपूर्ण कुटुंब सांभाळणाऱ्या स्त्रीमध्येही मला “चांगुणा‘ दिसते. काळ कोणताही असो पण आजही एकटी स्त्री ज्यावेळी स्वइच्छेने जगायचे ठरवते तेव्हा थोड्यफार फरकाने असाच संघर्ष तिच्या वाट्याला येतो त्याबद्दल वाईट वाटते.